नितीन गडकरी : अँग्लो हिंदी शाळेत विकास पुरूषांचा अभिनंदन व सत्कार सोहळा यवतमाळ : आजच्या परिस्थितीत ज्या देशाची ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानावर पकड असेल तोच देश जगाचे प्रतिनिधित्व करू शकतो, असे मत केंद्रीय जहाज बांधणी तथा भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. बुधवारी येथील अँग्लो हिंदी हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भ व राष्ट्र निर्माणामध्ये उल्लेखनीय योगदान देणारे नितीन गडकरी, प्रफुल्ल पटेल, हंसराज अहीर या विकास पुरुषांचा हिंदी प्रसारक मंडळ बेरार यवतमाळतर्फे हा अभिनंदन व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी प्रसारक मंडळ बेरारचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा होते. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय उर्वरक व रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, लोकमत मीडिया लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, माजी आमदार कीर्ती गांधी, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, सीए प्रकाश चोपडा आदींची उपस्थिती होती. नितीन गडकरी म्हणाले, हिंदी प्रसारक मंडळ बेरार, यवतमाळ ही संस्था विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देत आहे. शाळेची इमारत किती अद्ययावत आहे, विद्यार्थ्यांचा गणवेश काय आहे, शाळेत कुठल्या सुविधा आहेत यापेक्षाही शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांवर कसे संस्कार करतात, हे महत्वाचे आहे. संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे म्हणजे देशाचे भविष्य उज्वल करणे होय. शिक्षणावर आम्ही जो खर्च करतो ती एक महत्वाची गुंतवणूक आहे. सध्याच्या युगात तंत्रज्ञानाला महत्व आले आहे. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान हीच खरी शक्ती आहे. माहिती तंत्रज्ञान, संशोधन, उद्योजकता विकास, ई-गव्हर्नस यासंबंधी शिक्षण महत्वाचे झाले आहे. संशोधनावर आपण फार कमी खर्च करतो. संशोधन देशातील सर्व क्षेत्रात होण्याची गरज आहे. सारेच डॉक्टर आणि अभियंते नकोत तर वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचीही देशाला गरज आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करा पण आवडीच्या क्षेत्रात काम करा. कारण कुठलेच काम कमी नाही. आवडीच्या क्षेत्रात काम कराल तर प्रगती होईल आणि यशही मिळेल. मी विदेशात जातो तेव्हा तेथे अनेक भारतीय मुले वेटर, कुकचे काम करताना दिसतात. त्यांचे वेतन १५ लाख महिना आहे. त्यामुळे गुणवत्ता असेल तर संधी उपलब्ध आहे. अनेक युवा अभियंता होऊन बँकेत काम करतात, तो त्यांचा विषय नसतो. आपण ज्या क्षेत्रात ज्ञान घेतले आहे त्या क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. आज ग्रामीण भागातील लोकांना तांत्रिक शिक्षण आणि शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचा पर्याय आपण देऊ शकतो काय, याचा विचार करण्याची गरज आहे. शेतीवर आधारित चांगला रोजगार ग्रामीण भागातच निर्माण कसा होईल, याचाही विचार व्हावा. परिस्थिती कठीण आणि प्रश्न गंभीर आहे. पण उत्क ट इच्छा असेल तर मार्ग काढता येतो. आपल्या संस्कृतीचे संचित फार मोठे आहे. शिक्षकांच्या हाती नवी पिढी आहे. केवळ पदवी पर्यंतची परीक्षा ही अंतिम नाही. तर एक चांगला नागरिक होणे ही खरी परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात प्रगती अवश्य करावी, सोबतच एक चांगला नागरिक बनून देशाची प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. खासदार प्रफुल पटेल म्हणाले, इंगजी, हिंदी, मराठी अशा वेगवेगळया शाळा असणे ही पद्धती फार दिवस चालणार नाही. या सर्व भाषिक शाळा एकच कराव्या लागतील. ज्या ज्ञानाची आज देशाला व जगाला खऱ्या अर्थाने गरज आहे, असा अभ्यासक्रम नव्याने तयार करावा लागेल. केवळ परंपरागत शिक्षण घेऊन चालणार नाही, तर ज्याला मागणी आहे, ज्याची गरज आहे आणि ज्या अभ्यासक्रमाला भविष्य आहे, असे शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावे, त्यामध्ये विशेष गुणवत्ता संपादन करावी. देशाची प्रगती होत असताना कौशल्यविकास आज महत्वाचा झालेला आहे. नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. पूर्वीच्या तुलनेत मुलांना आता जास्त संधी आणि सोयी उपलब्ध आहेत. नवनवे तंत्रज्ञान विकसित होत आहेत, त्यामुळे आव्हानेही बदलत आहेत. अशावेळी केवळ परंपरागत शिक्षणाने भागणार नसून तंत्रज्ञानाची जोडही या शिक्षणाला आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रातही आमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे. केवळ शासकीय नोकऱ्यांच्या भरवशावर अवलंबून न राहता खाजगी क्षेत्राचा विचार करणेही गरजेचे आहे. आज खाजगी क्षेत्रात शासकीय नोकरीपेक्षाही अधिक पगार आणि सोयीसुविधा मिळतात, हे लक्षात घेऊन तशी तयारी करणे गरजेचे आहे. या दृष्टीने नवी आव्हाने पेलताना या पिढीला शाळांमधून मार्गदर्शन आवश्यक आहे. देशाला प्रगती करायची असेल तर विकासाला पर्याय नसल्याचे प्रफुल्ल पटेल म्हणाले. नितीन गडकरींबाबत बोलताना त्यांनी गडकरी हे विकास करीत आहेत, सतत विकासकामे करणे हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. महत्वाचे म्हणजे ते विकासकामात राजकारण, पक्षीय भेदाभेद आणत नाहीत. त्यांच्या विकास कार्यात आम्हीही त्यांच्या सोबत आहोत, असे मत व्यक्त केले. बाबुजींनी महाराष्ट्रात आणि विदर्भात जी विकासकामे केली ती आजही अजरामर आहेत. नितिनजींकडूनही विदर्भाला मोठ्या अपेक्षा आहेत, असे पटेल म्हणाले. माजी प्राचार्य शंकरराव सांगळे, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे संचालक माणिकराव भोयर व गोरक्षण संस्थानचे विश्वस्त द्वारकाप्रसाद शर्मा यांचा ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन अमृत महोत्सवी सत्कार करण्यात आला. तिनही सत्कारमूर्तीच्यावतीने प्राचार्य शंकरराव सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबुजींनी आम्हाला घडवलं, त्यामुळे आम्हा तिघांनाही हा सन्मान बाबुजींच्या चरणी समर्पित करताना कृतार्थ वाटतं असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तत्पूर्वी स्वागतगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमात अँग्लो हिंदी व जवाहरलाल दर्डा शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, बंजारा नृत्य, आदिवासी नृत्य सादर करून उपस्थितांची दाद घेतली. संचालन अॅड़ प्रवीण जानी यांनी केले. कार्यक्रमासाठी प्राचार्य मदनलाल कश्यप, मिनी थॉमस व मुख्याध्यापक आर. बी. यादव यांच्या मार्गदर्शनात सर्व शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जगाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक
By admin | Published: November 26, 2015 2:44 AM