गुन्हा दाखल : भाजपा कार्यकर्ते आग्रही, नेत्यांकडून मात्र अडथळेदिग्रस : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत व्हॉटस्अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली. त्यामुळे दिग्रसमध्ये तणाव निर्माण झाला. कार्यकर्ते कारवाईसाठी आग्रही असताना यवतमाळातील नेत्यांकडून मात्र ‘सामाजिक बांधिलकी’ जोपासण्यासाठी त्यात अडथळे निर्माण केले गेले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाचे पानीपत झाले. एकहाती सत्ता अपेक्षित असताना प्रत्यक्षात भाजपा आघाडीला केवळ ५८ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल साईटस्वर भाजपा व त्या पक्षाच्या नेत्यांबाबत टिका-टिप्पणी केली जात आहे. अशीच एक आक्षेपार्ह पोस्ट दिग्रसमध्ये टाकली गेली. त्यात नरेंद्र मोदी यांना निशाणा बनविले गेले. ही बाब भाजपाच्या एका जागरुक पदाधिकाऱ्याच्या निदर्शनास येताच त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली. प्रकरण दिग्रस पोलीस ठाण्यात पोहोचले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ठाणेदार संजय देशमुख यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि २९५ अ कलमान्वये गुन्हा नोंदविला. मात्र या प्रकरणात वेगळेच राजकारण शिजले. सूत्रानुसार, या प्रकरणात पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी म्हणून भाजपाचे दिग्रसमधील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड आक्रमक व आग्रही होते. त्याच वेळी ही कारवाई होऊ नये म्हणून थेट दुबईतून भाजपाच्या यवतमाळातील नेत्यापर्यंत सूत्रे हलली. त्यानंतर नेत्यांनी यात काहीशी मवाळ भूमिका घेण्याच्या सूचना पोलीस व दिग्रसमधील कार्यकर्त्यांना केल्याचे सांगितले जाते. मात्र गुन्हा दाखल झाल्याने फार काही करता आले नाही. दरम्यान याप्रकरणी दिग्रसमध्ये भाजपाचे दोन गट पडले. एका गटाने ती आक्षेपार्ह पोस्ट थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना पाठविली. त्याचे गांभिर्य ओळखून दानवे यांनी यवतमाळातील भाजपा नेत्याला ‘टाईट’ केले. त्यामुळे हा नेता ईकडे मित्रत्व आणि तिकडे पक्ष अशा दुहेरी कोंडीत सापडला. या प्रकरणी संशयिताचा शोध घेणे सहज शक्य असताना राजकीय दबावामुळे आरोपी अज्ञात दाखविला गेल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्टने दिग्रसमध्ये तणाव
By admin | Published: November 11, 2015 1:53 AM