विशेष लेख: ‘माफ करना राहुल, मेरे भाई!’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:45 AM2024-09-05T11:45:52+5:302024-09-05T11:48:32+5:30

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या टीकाकार स्मृती इराणी हल्ली म्हणाल्या, त्यांना कमी लेखू नका! दुसरे टीकाकार गायक रॉकी मित्तल यांचेही हृदयपरिवर्तन झाले आहे.

Featured Article: 'Sorry Rahul, Mere Bhai!' | विशेष लेख: ‘माफ करना राहुल, मेरे भाई!’

विशेष लेख: ‘माफ करना राहुल, मेरे भाई!’

- हरीष गुप्ता
(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)

विचित्र वाटले तरी हे खरे आहे. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत ९९ जागा जिंकल्या. राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कमालीचा बदलला आहे. राहुल गांधी यांनी वेगवेगळे विषय उपस्थित करावेत आणि त्या प्रश्नांचा मुकाबला करण्यासाठी भाजपला धावपळ करावी लागावी, असे चित्र स्पष्टपणे दिसते आहे. जातीनिहाय जनगणना हा त्यातलाच एक प्रश्न. परंतु काही दशकांपासून राहुलच्या कठोर टीकाकार असलेल्या स्मृती इराणी यांनी दिलेला धक्का फारच मोठा म्हणायचा. 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केल्यानंतर स्मृती इराणी यांना आकाश ठेंगणे झाले होते. राहुल नाव घेऊन त्या नेहमी थट्टा करायच्या. परंतु आता राहुल यांचे सहकारी किशोरीलाल शर्मा यांच्याकडून अमेठीत मानहानिकारकरीत्या पराभव पत्करावा लागल्यानंतर त्या फार कोठे दिसेनाशा झाल्या. मंत्री म्हणून मिळालेला बंगलाही त्यांनी सोडला. अलीकडेच त्या अचानक प्रकटल्या आणि त्यांनी राहुल गांधी यांनी स्वीकारलेल्या नव्या दृष्टिकोनाबद्दल प्रशंसोद्गार काढले. ‘राहुल यांना कमी लेखू नका’ असे त्या म्हणाल्या. एका पॉडकास्टमध्ये स्मृती इराणी म्हणाल्या, ‘राहुल आता नव्या प्रकारचे राजकारण करत आहेत.’ पुढे त्यांनी अशीही पुस्ती जोडली की राहुल यांचे धोरण बदलण्यामागे राजकारणच आहे. मवाळ हिंदुत्वाचा पत्ता चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु त्यात अपयश आल्यानंतर राहुल गांधींनी पवित्रा बदलला आहे, असे त्यांचे म्हणणे. स्मृती इराणी आता राजकीय कामाच्या शोधात असून अजूनपर्यंत तरी त्यांच्या हाती काही लागलेले नाही. 
दुसरे एक हरियाणवी गायक संगीतकार जयभगवान मित्तल उर्फ रॉकी मित्तल यांचेही हृदय परिवर्तन झाले आहे. बरीच वर्षे ते राहुल गांधी यांचे टीकाकार होते; पण आता त्यांनी राहुल यांची जाहीर माफी मागितली आहे. ‘माफ करना राहुल, मेरे भाई, भाजप नेतृत्वाचा मी आंधळा भक्त झालो होतो. मी तोंडघशी पडलो. कृपा करून मला क्षमा कर.’ - असे ते म्हणाले. मित्तल यांची भाजपशी फारकत होईल, असे दिसते.

भाजपकडून संघाच्या मनधरणीचे प्रयत्न
हे विचित्र वाटेल; पण खरे आहे. भाजपचे नेतृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंस्थेचा रोष शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. केंद्र सरकारने घेतलेल्या दोन निर्णयांविषयी राजकीय निरीक्षकांनाच नव्हे तर संघालाही आश्चर्य वाटले. जगातील सर्वात मोठे सामाजिक संघटन असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील व्हायला सरकारी कर्मचाऱ्यांना अनुमती देणारा निर्णय सरकारने स्वतःहूनच घेतला. काँग्रेस राजवटीने सुमारे ४० वर्षांपूर्वी त्यावर घातलेली बंदी उठवावी, अशी विनंती संघाने २०१५ सालीच केली होती. संघ आणि भाजप एकमेकांना मजबूत करण्यासाठी काम करत असले तरी २०१५ सालापासून संघाने आपल्या मागणीविषयी सरकारला कधीही स्मरण दिले नाही. सरसंघचालक मोहन भागवत यांना सर्वोच्च सुरक्षा देण्याचा निर्णयही असाच अचानक झाला. भागवत यांनी आपली सुरक्षा वाढवावी, अशी मागणी कधीही केली नव्हती. परंतु गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या शिफारशीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबरीची झेड प्लस दर्जाची सुरक्षा यंत्रणा भागवत यांना दिली. असे असले तरी जयप्रकाश नड्डा यांच्या जागी नवा पक्षाध्यक्ष नेमण्याच्या विषयावर मात्र संघ मागे हटायला तयार नाही. पक्षाध्यक्षपदी आपण सुचवलेली व्यक्तीच असेल, असे संघाचे म्हणणे आहे. सरकारचा कारभार चालवायला पंतप्रधान मोकळे आहेत. कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे हा पूर्णतः त्यांचा अधिकार आहे. परंतु पक्षाचा विषय असेल तेव्हा संघाच्या पसंतीचा माणूस असला पाहिजे, अशी ही भूमिका आहे. भाजपच्या अध्यक्षपदी नव्याने कोणाला बसवायचे याचा निर्णय न होण्यामागे वेळेचा अभाव आणि अन्य काही कारणेही आहेत. आता निर्णय पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत पुढे ढकलण्यात आला असून हा कुटुंबातला विषय कुटुंबातच सोडवला जाईल, अशी आशा संघाने व्यक्त केली आहे.
 

घरवापसी टांगणीला
जम्मू आणि काश्मीरच्या सेवेत असलेले २०१० च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. शाह फैजल हे नशीबवान म्हणायचे. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन स्वतःचा पक्ष काढला आणि दोन वर्षांनंतर राजकारण सोडून ते सेवेत परतले. आता दुसरे आयएएस अधिकारी आपल्याला अशाच प्रकारे पुन्हा सेवेत घेतले जाईल, अशी आशा करत आहेत. २०११ च्या उत्तरप्रदेश बॅचचे भावखाऊ आणि फटकळ आयएएस अधिकारी अभिषेक सिंह यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश केला.  आता त्यांना सेवेत परत यायचे आहे. मात्र ‘त्यांना घेऊ नका’ अशी शिफारस राज्य सरकारने केली आहे. अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. सिंह यांचे राजकीय उद्योग लक्षात घेऊन केंद्र सरकारही त्यांच्या विनंतीचा विचार करायला तयार नाही. ऑक्टोबर २०२३ मध्ये सिंह यांनी जौनपूरमधून भाजपचे तिकीट मिळावे, यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले; परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. जातवार जनगणना आणि आरक्षणाच्या मुद्द्याला त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे गोष्टी आणखी कठीण झाल्या. सिंह यांच्या पत्नी दुर्गा शक्ती नागपाल या लखीमपूर खेरीच्या जिल्हाधिकारी आहेत.

Web Title: Featured Article: 'Sorry Rahul, Mere Bhai!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.