... तर राजकारणातून संन्यास घेईन, नवज्योतसिंग सिद्धूंनी दिलं चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 15:47 IST2019-04-29T15:29:41+5:302019-04-29T15:47:43+5:30
भाजपाचे गुणगान गाणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपा नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेसचा हात हातात धरला.

... तर राजकारणातून संन्यास घेईन, नवज्योतसिंग सिद्धूंनी दिलं चॅलेंज
लखनौ - पंबाज सरकारमधील मंत्री आणि काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघात निवडणुकीत पराभूत झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे म्हटले आहे. रायबरेलीत सोनिया गांधी यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीवेळी माध्यमांशी बोलताना सिद्धू यांनी हे आव्हान दिलं आहे.
भाजपाचे गुणगान गाणाऱ्या नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपा नेत्यांशी मतभेद झाल्यानंतर काँग्रेसचा हात हातात धरला. त्यानंतर, काँग्रेस पक्षाकडून त्यांना पंबाजमध्ये मंत्रीपदही देण्यात आले आहे. जर कुणाला राष्ट्रवाद शिकायचा असल्यास त्यांनी युपीए प्रमुख सोनिया गांधींकडून शिकावा. सोनिया गांधी यांच्यामुळेच काँग्रेस 10 वर्षे सत्तेत होती. काँग्रेसने देशात भरपूर विकास केला आहे. सुईपासून जहाँजापर्यंत सर्वकाही आपल्या देशात बनते. काँग्रेसने गेल्या 70 वर्षात काय केले, असे म्हणणाऱ्या भाजपाला सिद्धू यांनी टोला लगावला. तसेच, जी व्यक्ती भाजपासोबत असते, भाजपाशी एकनिष्ठ राहते तिला देशभक्त म्हटले जाते आणि जी व्यक्ती भाजपाला सोडून जाते, त्यास देशद्रोही म्हटले जाते, असे म्हणत सिद्धू यांनी भाजपावर आगपाखड केली.
नवज्योतसिंग सिद्धू सध्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा प्रचार करत आहेत. त्यासाठी देशभरातील सभांना हजेरी लावून काँग्रेसची भूमिका लोकांना समजावून सांगत आहेत.