भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 02:24 PM2024-07-02T14:24:29+5:302024-07-02T14:26:23+5:30
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातील टिप्पणी कामकाजात पूर्ववत ठेवावीत, अशी विनंती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे.
![Rahul Gandhi writes to Lok Sabha Speaker Om Birla on expunging his remarks: ‘Taking off my remarks against tenets of Parliamentary democracy’ | भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम Rahul Gandhi writes to Lok Sabha Speaker Om Birla on expunging his remarks: ‘Taking off my remarks against tenets of Parliamentary democracy’ | भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/rahul-gandhi-lok-sabha_2024071259456.jpg)
भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम
नवी दिल्ली : संसदेच्या कामकाजाच्या सहाव्या दिवशी (1 जुलै) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. यावेळी राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरण, अग्निवीर योजना आणि मणिपूर मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग हटवण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातील टिप्पणी कामकाजात पूर्ववत ठेवावीत, अशी विनंती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले, "माझ्या भाषणातील बराचसा भाग कामकाजातून काढून टाकण्यात आल्याने मला धक्का बसला आहे. हे संसदेच्या नियमांच्या विरोधात आहे."
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचे भाषणही आरोपांनी भरलेले होते, मात्र त्यांच्या भाषणातून एकच शब्द काढण्यात आला. याबाबत केलेला भेदभाव समजण्यापलीकडचा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, सभागृहात सत्य मांडले. संसदेत जनतेशी संबंधित प्रश्न मांडण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे. हेच लक्षात घेऊन मी माझे भाषण दिले. नरेंद्र मोदींच्या जगात सत्य पुसले जाऊ शकते, परंतु वास्तवात नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पत्र लिहिल्यामुळे भाजपने पलटवार केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणातील हिंदू आणि इतर काही धर्मांबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांचा समावेश आहे. तसेच, नरेंद्र मोदी, आएसएस, भाजपवरचा भाग नोंदीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे.