मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 01:51 PM2024-09-28T13:51:23+5:302024-09-28T14:04:18+5:30

हैदराबादमध्ये तेलंगणा सरकारमधील मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्या ठिकाणांवर ईडीने धाड टाकली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर ईडीने ही कारवाई केली. विशेष म्हणजे या मंत्र्यांच्या मुलाने ५ कोटीचे घड्याळ खरेदी केल्यानंतर ईडीनं ही कारवाई केली.

घड्याळाचं हे खरेदी प्रकरण कस्टममध्ये अडकले. कस्टम विभागाने चौकशी केली असता हवाला आणि क्रिप्टोकरेंसीतून हा व्यवहार झाल्याचं उघड झाले. त्यानंतर ईडीनेही या प्रकरणी लक्ष घालत संबंधित मंत्र्यांच्या घर, कार्यालयावर धाड टाकली.

ईडीनं त्यांचा तपास कस्टम विभागाच्या चेन्नईच्या कार्यालयातून सुरू केला. मंत्र्यांचा मुलगा पी. हर्षा रेड्डी याने दोन आलिशान घड्याळे खरेदी केल्याप्रकरणी ही बाब निदर्शनास आली. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने हर्षा रेड्डी यांना समन्स बजावले होते.

या महागड्या घड्याळांची हाँगकाँगमधून सिंगापूरला तस्करी करण्यात आल्याचे कस्टम विभागाच्या तपासात समोर आले आहे. एक व्यापारी सिंगापूरहून परतत असताना सीमाशुल्क विभागाने ही घड्याळे जप्त केली.

जप्त करण्यात आलेल्या घड्याळांमध्ये पाटेक फिलिप 5740 आणि ब्रेग्वेट 2759 यांचा समावेश आहे. ही घड्याळे खरेदी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि हवालाचा वापर केल्याचेही ईडीच्या तपासात समोर आले आहे.

दरम्यान, ईडीने टाकलेल्या छाप्यादरम्यान कोणालाही घराच्या आत किंवा बाहेर जाण्यास परवानगी दिली नाही. मुख्य दरवाजाही बंद करण्यात आला होता. दरवाजाबाहेर माध्यम कर्मचाऱ्यांची गर्दी जमा झाली होती. रात्री उशिरापर्यंत ईडीचे छापे सुरूच होते.

मंत्र्याच्या मुलानं पाच कोटी रुपयांची दोन घड्याळे खरेदी केली. या घड्याळांसाठी दिलेली रक्कम १०० कोटी रुपयांच्या कथित हवाला आणि क्रिप्टो करन्सी रॅकेटशी जोडलेली आहेत.ए नवीन कुमार नावाच्या व्यक्तीची ईडीच्या चौकशीत आहे.

काँग्रेस नेते श्रीनिवास रेड्डी हे तेलंगणा सरकारमध्ये महसूल, गृहनिर्माण, माहिती आणि जनसंपर्क मंत्री आहेत. मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय हालचालींना वेग आला.

केंद्र सरकारवर ईडी-सीबीआयचा गैरवापर होत असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने ईडी आणि सीबीआयवर भाजपासाठी देणग्या गोळा केल्याचा आरोपही केला होता.

काँग्रेसच्या या आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला इतिहासाची आठवण करून दिली होती आणि या एजन्सी तुमच्या हातातील बाहुल्या होत्या, मग तुम्ही निवडणूक का हरलात असा सवाल मोदींनी काँग्रेसला विचारला होता.