RSS नं भाजपाला दिला 'विजयी' मंत्र; विधानसभा निवडणुकीपूर्वी समोर आला नवा शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 02:34 PM2024-08-14T14:34:03+5:302024-08-14T14:48:45+5:30

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आणि आरएसएस यांच्यात समन्वय बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यात अतुल लिमये यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीकडून महाराष्ट्र विधानसभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात असणाऱ्या सरकारचा कार्यकाळ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. मात्र पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आणणं आव्हानात्मक बनलं आहे.

भाजपानं विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वारंवार बैठका सुरू आहेत. उमेदवार निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडे द्यावेत असं मत कोअर कमिटीच्या नेत्यांनी वर्तवलं. त्यात भाजपा आणि आरएसएस यांच्यातही समन्वय बैठका सुरू आहेत.

आरएसएसकडून भाजपाशी समन्वय ठेवण्यासाठी अतुल लिमये यांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी भाजपा-आरएसएसमध्ये विलेपार्ले येथे एक समन्वय बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकण्याची रणनीती यावर चर्चा झाली. याआधी ११ ऑगस्टला दिल्लीत भाजपा-संघाची बैठक झाली होती.

सूत्रांनुसार, संघाकडून भाजपाला काही विजयमंत्र देण्यात आले आहेत. त्यात पक्षाकडून कुठल्याही एका चेहऱ्याऐवजी सामुहिक नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जावं असं संघाने सांगितले आहे. इतकेच नाही तर राज्य सरकारविरोधात होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही संघाने चिंता व्यक्त केली.

संघाने सह सरकार्यवाह (संयुक्त महासचिव) अतुल लिमये यांची संघाच्या समन्वयकपदी नियुक्ती केल्यावर त्यांचे विचार आणि सल्ला भाजपाला दिला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच २०१४ पासून राज्यात पक्षाचं नेतृत्व केले आहे. परंतु यावेळी पक्षाने सामुहिक नेतृत्वाने सामोरं जावं अशी संघाची इच्छा आहे.

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणे घातक ठरेल असं संघाला वाटते. ओबीसी, मराठा आणि अनुसूचित जातीच्या नेत्यांच्या सामुहिक नेतृत्वामुळे पक्षाविरोधातील अस्वस्थता आणि नाराजी कमी होण्यास मदत होऊ शकते अशी आशा संघाला आहे.

त्याचसोबत CM एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही संघाकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी, आरएसएसच्या मुखपत्रात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी महायुतीत सहभागी झाल्याबद्दल आरएसएसनं प्रश्न उपस्थित केले होते.

लोकसभा निकालांचा अभ्यास आणि मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष्य केल्याने संघाने भाजपला हा सल्ला दिल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जातं. फडणवीसांविरोधात सातत्याने वक्तव्यामुळे मराठा समाजात फडणवीसांविरोधात आक्रोश आहे.

कोण आहेत अतुल लिमये? - यंदाच्या वर्षी मार्चमध्ये संघाच्या टॉप लीडरशीपमध्ये बदल केले होते. संघाने शताब्दी वर्षापूर्वी तरुणांचा समावेश करण्याच्या धोरणाचा हा एक भाग होता. अतुल लिमये दिर्घकाळ क्षेत्र प्रचारक म्हणून काम करत आहेत.

लिमये यांना संघाकडून सह सरकार्यवाह म्हणून बढती देण्यात आली. अतुल लिमये महाराष्ट्रातून येतात. ते पश्चिम भागातील संघाचे प्रसिद्ध 'क्षेत्र प्रचारक' होते. महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आणि विस्तार यावर त्यांनी देखरेख ठेवल्याचे सांगितले जाते. ज्यात गुजरात, नागपूर व्यतिरिक्त यामध्ये गोव्यातील RSS मुख्यालयाचाही समावेश आहे. लिमये यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अनेक वर्षे काम केले आहे.