महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 05:05 PM2024-09-23T17:05:27+5:302024-09-23T17:11:52+5:30

MVA Seat Sharing: महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटप सुरु झाले असून या दोन आघाड्यांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी उभी राहत आहे. एकंदरीत यंदाची विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु झाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटप सुरु झाले असून या दोन आघाड्यांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी उभी राहत आहे. एकंदरीत यंदाची विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास फायनल झाल्याचे समोर येत आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी असे तीन मोठे पक्ष आहेत. तर त्यांच्यासोबत काही छोट्या संघटना, पक्ष आहेत. २८८ पैकी चार जागा या मित्र पक्षांना देण्याचे मविआच्या जागावाटपाच्या बैठकीत ठरले आहे. एनबीटीने याचे वृत्त दिले आहे. त्यांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २८८ जागांचे वाटप पूर्ण झाले आहे.

जिंकण्याची क्षमता त्याचा उमेदवार असा फॉर्म्युला म्हणता म्हणता २०१९ च्या निवडणुकीत जो जिंकला त्याचा उमेदवार या फॉर्म्युल्यावर बैठकीत एकमत झाले. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवरही निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार एकूण २८४ जागा मविआने तीन पक्षांमध्ये विभागल्या आहेत. तर चार जागा मित्र पक्षांसाठी ठेवल्या आहेत.

या जागावाटपानुसार काँग्रेस १००, ठाकरे गट १०० आणि शरद पवार राष्ट्रवादीला ८४ जागा देण्यात आल्या आहेत. एकमेकांकडील जागा घेण्याबाबत यापुढे चर्चा होऊ शकते, परंतू जागांचा आकडा मात्र बदलणार नाही, असे या सूत्रांनी साांगितले.

या जागा या ३० ते ३५ असून त्या मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईतील आहेत. या जागांवर तिन्ही पक्षांना आपापला दावा केलेला आहे. या जागांचा येत्या काही दिवसांत पुन्हा सर्व्हे केला जाणार आहे. यामध्ये ज्या पक्षाची ताकद जास्त त्याला ती जागा दिली जाणार आहे. त्या बदल्यात दुसऱ्या पसंतीची जागा दिली जाणार आहे.

याबाबतचा निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे. तसेच मुख्यमंत्रई पदाच्या चेहऱ्याशिवाय मविआ निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही ठरविण्यात आले आहे.

या जागावाटपानंतर तिन्ही पक्षांच्या जागा घटल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेला २६, काँग्रेसला ४७ व पवार राष्ट्रवादीला २१ जागांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निवडणुकीत या पक्षांनी अनुक्रमे १२६, १४७ आणि १२१ जागा लढल्या होत्या.