लोकसभेत अंबानी-अदानी नाव घेण्यास आक्षेप का?, राहुल गांधींना रोखलं, जाणून घ्या नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 10:55 AM2024-08-01T10:55:01+5:302024-08-01T11:00:25+5:30

काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २९ जुलैच्या बैठकीत चर्चेवेळी त्यांच्या भाषणातून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. केंद्र सरकार चक्रव्यूह बनवत असून आम्ही त्याला तोडण्याचं काम करतो. यावेळी भाषणात राहुल गांधींनी अंबानी आणि अदानी यांचं नाव घेतलं होते.

लोकसभेत भाषण करताना राहुल गांधींनी काही नावे सभागृहात घेतली. मात्र लोकसभेच्या कामकाजातून ही नावे हटवण्याचे निर्देश लोकसभा अध्यक्षांनी दिले. मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी या नावांचा उल्लेख करत राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत.

मग अशावेळी अखेर राहुल गांधींनी घेतलेल्या नावांवर सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप का घेतला जातो, संसदेत कुठल्याही व्यक्तीचे नाव का घेताना कुठले नियम पाळले जातात. लोकसभेच्या कामकाजातून हे शब्द का हटवले जातात त्याबाबत नियम काय आहेत हे जाणून घेऊया.

नियम ३८० - लोकसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम ३८० नुसार जर अध्यक्षांना वाटलं, भाषणावेळी काही अशा शब्दांचा वापर झाला आहे जे अशोभनीय किंवा अपमानजनक अथवा असंसदीय आहे तर तो कामकाजातून वगळण्याचे आदेश देऊ शकतात. भारतीय संसदेत भाषणावेळी कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीचं नाव घेण्यावर निर्बंध आहेत. हे निर्बंध संसदीय नियम आणि प्रक्रियातंर्गत लावले जातात.

नियम ३५२ - लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम" च्या नियम ३५२ मध्ये असं म्हटलं आहे की, कोणताही सदस्य कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊ शकत नाही जोपर्यंत ती व्यक्ती संसदेच्या कामकाजाचा भाग नाही. त्याचप्रमाणे, राज्यसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांतर्गतही अशा तरतुदी आहेत.याशिवाय, अशा सदस्याचे नाव देखील तेव्हाच घेतले जाऊ शकते जेव्हा त्याच्याशी संबंधित माहिती प्रमाणित आणि सत्यापित केली जाईल.

नियम ३५३ - संसदेत, एखाद्या खासदाराला भाषणादरम्यान कोणत्याही व्यक्तीवर आरोप करायचे असल्यास, "लोकसभेच्या कार्यपद्धती आणि कामकाजाचे नियम" च्या नियम ३५३ नुसार, अध्यक्ष किंवा सभापती यांना त्या व्यक्तीबद्दल आगाऊ माहिती द्यावी आणि अध्यक्ष किंवा सभापतींनी परवानगी दिली तरच त्याच्यावर आरोप केले जाऊ शकतात.

दरम्यान, लोकसभेच्या नियमावली पुस्तकात ३४९ पासून ३५६ नियम हे संसदेत भाषण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टींचा उल्लेख टाळला पाहिजे यावर भाष्य करते. नियम ३४९(१) यानुसार, सभागृहात भाषण करताना सभागृहाच्या कामकाजाशी काहीही संबंध नसलेले कोणतेही पुस्तक, वर्तमानपत्र किंवा पत्र वाचता किंवा उल्लेख करता येत नाही.

नियम ३४९(२) या नियमानुसार, कोणत्याही सदस्याच्या भाषणादरम्यान गोंधळ आणि भाषणात व्यत्यय आणता येऊ शकत नाही. नियम ३४९(१२)कोणताही सदस्य सभापतींच्या खुर्चीकडे पाठ करून बसू किंवा उभा राहू शकत नाही असा हा नियम आहे.

नियम ३४९(१६) या नियमात कोणताही सदस्य सभागृहात कोणताही ध्वज किंवा चिन्ह प्रदर्शित करणार नाही. अलीकडेच राहुल गांधींनी भगवान शंकराचे चित्र दाखवले तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी या नियमाचा हवाला दिला होता.

राहुल गांधींनी सभागृहात ४ नावे घेतली होती, ज्यांचा या सभागृहाशी कुठलाही संबंध नाही. त्यावेळी लोकसभा अध्यक्षांनी त्यांना रोखलं, त्यानंतर उत्तर देताना राहुल गांधींनी अजित डोवाल, अदानी आणि अंबानी यांची नावे सभागृहात घेऊ नयेत असं त्यांना वाटत असेल तर ते घेणार नाही. पण मला नाव घेता येत नसेल तर दुसरी व्यवस्था करा. त्यांच्या नावांऐवजी मी A-1, A-2 असं म्हणतो.