Airtel ची मोठी घोषणा, 'या' यूजर्सना रिचार्जशिवाय मोफत कॉलिंग आणि डेटा सेवा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 02:36 PM2024-08-01T14:36:07+5:302024-08-01T15:06:06+5:30

Airtel : देशातील दूरसंचार क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलनं वायनाडच्या लोकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळं केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळं मोठं नुकसान झालं आहे. या आपत्तीत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. दरम्यान, देशातील दूरसंचार क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी एअरटेलनं वायनाडच्या लोकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.

एअरटेलनं वायनाडमध्ये आपल्या ग्राहकांसाठी अनेक दूरसंचार सेवा मोफत केल्या आहेत. एअरटेलनं आपत्तीग्रस्त भागात आपल्या युजर्सना मोफत दूरसंचार लाभ देण्याची मोठी घोषणा केली आहे. कंपनीनं केवळ प्रीपेडच नव्हे तर पोस्टपेड युजर्ससाठीही मोबाइल सर्व्हिसला एक्सटेंड करण्याची घोषणा केली आहे.

एअरटेलनं प्रीपेड युजर्सना दिलेल्या सवलतीबद्दल सांगायचं झाल्यास ज्या युजर्सचे रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी संपली आहे, त्यांच्यासाठी हे प्लॅन्स सादर करण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे रिचार्ज संपल्यानंतर रिचार्ज न करू शकलेल्या युजर्सची व्हॅलिडिटी वाढवण्यात आली आहे.

याशिवाय यूजर्सना फ्री कॉलिंग तसंच डेटाची सुविधाही दिली जाईल. ज्या युजर्सची व्हॅलिडिटी संपली आहे, त्यांच्या प्लॅनची ​व्हॅलिडिटी ३ दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. युजर्सना दररोज 1GB डेटा ऑफर केला जातो. फ्री कॉलिंगसोबत, तुम्हाला दररोज १०० एसएमएस देखील मिळतात.

जर पोस्टपेड युजर्सच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीनं वायनाड युजर्ससाठी बिल भरण्याची अंतिम मुदत ३० दिवसांनी वाढवली आहे. म्हणजे आता यूजर्स आणखी १ महिना टेलिकॉम सेवेचा वापर करू शकतील. मात्र, यानंतर युजर्स पुढील महिन्यात थेट २ महिन्यांचे बिल जमा करू शकतील.