मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 09:35 AM2023-07-20T09:35:07+5:302023-07-20T09:35:18+5:30

रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

A heart-wrenching accident; Deputy CM Ajit Pawar reviewed from the emergency control room | मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

मन पिळवटून टाकणारी दुर्घटना; अजित पवारांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतला आढावा

googlenewsNext

गेल्या २४ तासांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रायगडमधील इर्शाळवाडी इथं दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. याठिकाणी २५० लोकांची वस्ती असून त्यातील १०० लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. रात्रीपासून दुर्घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरु आहे. डोंगरावर सतत सुरू असलेला लँड्स लाईड आणि जोरदार पावसामुळे रेस्क्यूमध्ये अडचण निर्माण होत आहे. घटनेस्थळी मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, दादा भुसे पहाटेपासूनच पोहचले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इर्शाळवाडी इथं दाखल झाले आहेत. राज्य सरकार हॅलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याचा विचार केला, मात्र सध्याच्या स्थानिक वातावरणामुळे ते शक्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहोचले असून तिथून खालापूरनजीक इरशाळगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत. अजित पवारांनी स्थानिक जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील फोन करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ट्विट करत या दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड कोसळून झालेली दुर्घटना मन पिळवटून टाकणारी आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. परंतु पाऊस सतत पडत असल्यानं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल अशी प्रार्थना करतो, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या २५ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर १०० जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. 

रात्री नेमकं काय घडलं?

रात्री पाऊस पडत होता, आम्ही सगळे घरात झोपलो होतो. तितक्यात मोठा आवाज झाला, त्यामुळे आम्ही घाबरलो, तातडीनं मुलाबाळांना घेऊन घरातून बाहेर पडलो. बाहेर आलो तेव्हा अनेक घर दरडीखाली गेल्याचे दिसून आले. मोठी झाडे पडली होती. आमचे घर खचले आम्ही तिथून खाली आलो असं या दुर्घटनेत वाचलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: A heart-wrenching accident; Deputy CM Ajit Pawar reviewed from the emergency control room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.