अतिशय अवघड पायवाट, तरीही एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 02:00 PM2023-07-20T14:00:56+5:302023-07-20T14:01:16+5:30

परिसरात पाऊस सुरु असून इर्शाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी  न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

CM Eknath Shinde decided to go to the Raigad Irshalwadi Landslide Incident spot himself | अतिशय अवघड पायवाट, तरीही एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा घेतला निर्णय

अतिशय अवघड पायवाट, तरीही एकनाथ शिंदेंनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा घेतला निर्णय

googlenewsNext

रायगडच्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना १९ जुलै २०२३ रोजी रात्री घडली. या दुर्घटनेत गावातली घरे मातीच्या ढिगाऱ्या खाली गेली आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास ९८ जणांच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं ही दुर्घटना घडली. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबी सारख्या मशनरी घटनास्थळी पोहोचविण्यासाठी अडथळे येत आहेत.

भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. इर्शाळवाडी वस्तीवर दरड कोसळून दुर्घटना घडली असून तेथे मदतकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. या परिसरात पाऊस सुरु असून इर्शाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी  न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. L&T ची एक मोठी रेस्क्यू टीम ची तुकडी रेस्क्यू करण्यासाठी इर्शाळवाडीवर दाखल झाली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटेपासून घटनास्थळी तळ ठोकून आहे. त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत देखील आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इर्शाळवाडीत भूस्खलन झालेल्या ठिकाणी चालत जात आहेत. ही अतिशय अवघड पायवाट असून या ठिकाणी अडकलेल्या ग्रामस्थांना मदत पोहोचवून बचावकार्य करण्याबरोबरच जनतेला धीर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घटनास्थळी जाण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी जाताना भेटलेल्या इर्शाळवाडीतील ग्रामस्थांची मुख्यमंत्री शिंदे यांनी आस्थेने विचारपूस केली, प्रत्यक्ष परिस्थितीदेखील जाणून घेतली. त्याना धीर देत सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला स्वयंसेवी संस्था तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. NDRFHQच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीला यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक तसेच मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागांच्या शासकीय कर्मचाऱ्यांसह पाचशेहून अधिक मजूर सहभागी झाले आहेत. रत्नागिरीहून १० कंटेनर मागविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी  सकाळी केलेल्या आवाहनानंतर परिसरातील एमआयडीसीमधील असंख्य कामगार मदतीसाठी घटनास्थळी दाखल होत असून ते एनडीआरएफला बचावकार्यात मदत करीत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली. 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळीच घटनास्थळी रवाना झाले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदार महेश बांदे उपस्थित आहेत. तर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. सकाळपासूनच मंत्रालयातल्या आपत्कालिन नियंत्रण कक्षातून मी स्वत: सर्व बाबींवर लक्ष ठेऊन आहे. इर्शाळवाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब आहेत, तेथील लोकसंख्या २२८ असली तरी अनेक लोक नोकरीच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गावी असतात त्यामुळे दुर्घटनेच्यावेळी नक्की किती लोक गावात होते हे समजू शकत नाही. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते. तसेच या ठिकाणी यापुर्वी दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नव्हत्या, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. 

Web Title: CM Eknath Shinde decided to go to the Raigad Irshalwadi Landslide Incident spot himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.