काँग्रेसचा 'विजयी' फॉर्म्युला! लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही नेत्रदीपक कामगिरी करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 01:57 PM2024-10-04T13:57:07+5:302024-10-04T14:02:52+5:30

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यातील सर्वाधिक १३ जागा जिंकल्या, तर एका अपक्ष खासदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ साली केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसच्या या कामगिरीने अनेकांना आश्चर्यचकीत केले.

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपतानाच महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाच्या नेतृत्वात राज्यात महायुती सत्ता टिकवण्यासाठी धडपडत आहे तर काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हरियाणा, जम्मू काश्मीरनंतर आता काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे.

राहुल गांधी २ दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. इथं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहेत. त्यानंतर शनिवारी संविधान बचाओ संमेलनाचं आयोजन करून राज्यात सामाजिक न्याय अजेंडा सेट करण्याची रणनीती आखतील.

महाराष्ट्राच्या निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकतात. त्यामुळे राहुल गांधी शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या निवडणूक मैदानात उतरत आहेत. राहुल गांधींनी निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करण्यासाठी सामाजिक न्यायाची भूमी कोल्हापूर निवडलं आहे. याठिकाणी काँग्रेस पुन्हा त्यांची ताकद दाखवण्यासाठी तयार आहे.

कोल्हापुरातील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल करतील. महाराष्ट्राची अस्मिता आणि राजकारण यात छत्रपती शिवाजी महाराजांभोवती फिरते. मालवणमधील घडलेल्या प्रकारानंतर राज्यात विरोधकांनी महायुती सरकारला घेरले होते. या प्रकरणी स्वत: मोदींनी महाराष्ट्रात आल्यानंतर जनतेची माफी मागितली होती.

राहुल गांधी कोल्हापूरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करतील आणि शनिवारी संविधान बचाओ संमेलनात सहभागी होत सामाजिक न्याय अजेंडा मजबूतपणे ठेवतील. राहुल गांधी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरून वाढवावी अशी मागणी करत आहेत. त्यात कोल्हापूरसारखं शहर त्यांनी निवडलं जिथं छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा आवाज देत सर्वप्रथम आरक्षण दिले होते.

१९०२ मध्ये मागासवर्गीय यांना ५० टक्के आरक्षण देण्यात आलं होते, कोल्हापूरात आज काँग्रेसचे शाहू छत्रपती हे खासदार आहेत. सामाजिक न्यायाची भूमिका पुढे करत राहुल गांधी महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील. राहुल गांधींनी लोकसभेत संविधान आणि आरक्षण मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोदींविरोधात वातावरण तयार केले होते. त्याचा फटका भाजपाला निकालात बसला आहे.

काँग्रेस हाच विजयी मंत्र अवलंबत विधानसभा निवडणुकीची स्ट्रॅटर्जी तयार करतेय. दलित, ओबीसींसाठी राहुल कोल्हापूरातून महाराष्ट्रात जातीय जनगणना मुद्दा उचलू शकतात. राज्यात लोकसभेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. विदर्भ आणि मराठवाड्यात काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या

येणाऱ्या विधानसभेतही काँग्रेसनं या ठिकाणी लक्ष केंद्रीत केले आहे. तिथे जातीय समीकरण जुळवण्याचा काँग्रेस प्रयत्न करतेय. महाराष्ट्रात सर्वाधिक ३० टक्के लोकसंख्या मराठा समाजाची आहे. त्यानंतर दलित मुस्लीम ११-११ टक्के आहेत. ओबीसींची संख्या ४० टक्क्यांच्या आसपास आहे. जी वेगवेगळ्या पक्षासोबत विभागली गेली आहे.

महाराष्ट्रात ब्राह्मण समाज ६-८ टक्के आहे. विदर्भात दलित, मराठवाड्यात मराठा मतदार विधानसभा निवडणुकीच्या मतदानात निर्णायक भूमिका निभावणार आहेत. राज्यात काँग्रेसनं दलित, मराठा, मुस्लीम मतांचा आधार घेत राजकीय रणनीती आखली आहे.

काँग्रेसनं ज्या फॉर्म्युल्यावर २०२४ ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात जिंकली त्यात पक्षाला १३ आणि मित्रपक्षांना १७ जागा जिंकता आल्या. या निकालाने भाजपाला मोठा फटका बसला. केवळ ९ जागांवर भाजपा विजयी झाली. राज्यात आरक्षणाचा वाद पाहता राहुल गांधींनी सामाजिक न्याय अजेंडा प्रखरतेने मांडत जातीय समीकरणातून पक्षाला विजयाच्या दिशेने नेण्याचा मार्ग सुकर करतील का हे आगामी काळात स्पष्ट होईल.